- *एरंडोल येथे संविधान सन्मान परिषदेचे आयोजन….!*
एरंडोल ( प्रतिनिधी )
भारतीय संविधानात आलेली समता- बंधुता- स्वातंत्र्य ही मूल्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असून आज प्रचलित व्यवस्थेमार्फत समतेला तडा दिला जात आहे आणि भारतीय संविधानाचे मूल्ये व्यवस्था लाथाडली जात आहे, असे विधान राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेमध्ये एरंडोल येथे संविधान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अनंत राऊत यांनी केले. ते संविधान सभेच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.
राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद संयोजन समितीमार्फत सदर संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय भिक्खु संघाचे पुज्य भन्ते गुणरत्न महाथेरो , जागतिक किर्तीचे पूज्य भन्ते ज्ञानज्योती यांच्या भिक्खु संघाचे पुज्य भन्ते अमरज्योती, तसेच पुज्य भन्ते नागसेन , पुज्य भन्ते संघरक्षीत यांच्या मंगलमय उपस्थितीत संविधान सन्मान परिषद संपन्न झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉक्टर प्रदीप आगलावे सदर संविधान सन्मान परिषदेचे उद्घाटक होते. विचार मंचावर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गुलाबरावजी पाटील उपस्थित होते. एरंडोल पारोळा तालुक्याचे आमदार अमोलजी पाटील, संविधान प्रचारक व रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड, स्वागताध्यक्ष शालिग्राम दादा गायकवाड, मुख्य संयोजक प्रा. भरत शिरसाठ, बीएम फाउंडेशनचे मोहन भाऊ अडढांगळे, सुरेश भाऊ सोनवणे, मिलिंदभाऊ पवार, मुकुंदभाऊ सपकाळे, हेर्मेंद्र सपकाळे, वर्षा अहिरराव, प्राईम पब्लिकेशनचे प्रदिप पाटिल, प्रितम तायडे, डाॅ. सरोज डांगे, डाॅ. मिलींद बागुल, उषाकिरण खैरनार, समता शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डी के अहिरे, प्राध्यापक अशोक पवार, धनराज मोतीराय, प्राध्यापक सत्यजित साळवे आदी उपस्थित होते. विविध सत्रांचे मान्यवर म्हणून सेवानिवृत्त विस्ताराधिकारी अशोक बिऱ्हाडे, बापूसाहेब प्राध्यापक अशोक पवार, मुख्याध्यापक संघाचे भुसावळ अध्यक्ष जेपी सपकाळे, डॉक्टर संजय भटकर, बौद्ध महासभेच्या महिला विभागाच्या जळगाव जिल्हा अध्यक्षा मंगलाताई सोनवणे, महिला समिती प्रमुख उषाकिरण खैरनार, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार इत्यादी मान्यवर म्हणून उपस्थित होते.
तत्पूर्वी सकाळी आठ वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य अशा ‘संविधान बाईक रॅलीला’ सुरुवात झाली. सुंदर अशा संविधान रथावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान धारण केल्याची प्रतिमा लावण्यात आली होती. सदर प्रसंगी भैय्यासाहेब सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. सदर प्रसंगी एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमितदादा पाटील उपस्थित होते. रॅली प्रमुख ईश्वर भाऊ बिऱ्हाडे व स्वागताध्यक्ष शालिग्रामभाऊ गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले.
जळगाव जिल्हा व राज्यभरातून दोन हजारच्या जवळपास संविधान प्रेमी नागरिक सदर परिषदेला उपस्थित होते. मोठ्या प्रमाणावर बुक स्टॉल सदर प्रसंगी लागलेले होते व विक्रमी खरेदी या वेळेला ग्रंथप्रेमींमार्फत करण्यात आली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर अनंत राऊत पुढे म्हणाले की शासनाचे प्रतिनिधी संविधानाची शपथ घेतात परंतु मात्र आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडत नाहीत. देशात आज अंधश्रद्धेला चालना दिली जात असून देशाच्या विकासाची चक्रे उलटी फिरवली जात असल्याचे ते म्हणाले. ज्या प्रकारचे प्रशासन सर्वोच्च न्यायालयात चालले पाहिजे त्या प्रकारचे प्रशासन चालत नाही, असेही ते म्हणाले. आज जे सुरू आहे ते संविधानाच्या विरोधी चाललं आहे. म्हणून आपण या प्रवृत्तींना जाब विचारला पाहिजे, असे त्यांनी ठामपणे मांडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पूज्य भन्ते गुणरत्न, पूज्य भन्ते अमरज्योती, पूज्य भन्ते संघरक्षित, पूज्य भन्ते नागसेन यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज व संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविकेचे वाचन करून राष्ट्रीय ग्रंथ संविधानाचे स्मरण करण्यात आले. मंचावर दर्शनी भागात संविधानाची मांडणी करण्यात आली होती. बुद्धभूषण मोरे यांनी अतिशय सुंदर भीम गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सदर प्रसंगी अजय भामरे यांनी संविधानावर उत्कृष्ट पोवाडा सादर केला. ज्योती गजरे यांनी भीम गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. अनुभूती विद्यालय जळगावच्या विद्यार्थिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपटावर आधारित सुंदर नृत्य सादर केले. उद्घाटन कार्यक्रमांमध्ये संविधान शिल्पकार विशेषांक, संविधान सन्मान परिषद स्मरणिका व पुरस्कारार्थी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रा भरत शिरसाठ लिखित ‘भारतीय संविधानाचे अनंत उपकार’ तसेच वर्षा शिरसाठ लिखित ‘त्यागमूर्ती माता रमाई’ व डॉक्टर राहुल निकम लिखित ‘भारतीय संविधान मानव मुक्तीचा जाहीरनामा’ इत्यादी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संविधान शिल्पकार विशेषांकाचे संपादन साहित्यिक जयसिंग वाघ यांनी तर उर्वरित दोन स्मरणिकांचे संपादन प्राध्यापक भारत शिरसाठ यांनी केले. संविधान निर्मितीच्या काळातील चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सदर प्रसंगी करण्यात आले. प्रास्ताविक संविधान सन्मान परिषदेचे मुख्य संयोजक भरत शिरसाठ यांनी केले. याप्रसंगी स्वागताध्यक्ष शालिग्रामदादा गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या उद्घाटकीय भाषणामध्ये डॉक्टर प्रदीप आगलावे यांनी भारतीय संविधानाला आज दुर्लक्षित करून मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचे मत व्यक्त केले. न्यायालयाने असवैधानिक मार्गाने एससी -एसटी मध्ये उपवर्गीकरण लादले असल्याचे ते म्हणाले. या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये अनुसूचित जातीचा वर्गामध्ये प्रचंड नाराजी असून या विरुद्ध संवैधानिक लढा उभारला पाहिजे असेही त्यांनी म्हटले.
दुपारच्या परिसंवाद सत्रामध्ये जळगावचे साहित्यिक जयसिंग वाघ यांनी धर्माधिष्टीत संविधान निर्माणाचा प्रयत्न देशाच्या सार्वभौमत्वाला व अखंडतेला धोका आहे या विषयावर परखडपणे मत व्यक्त केले. दुसऱ्या परिसंवादामध्ये नुरखाॅ पठाण आणि डॉक्टर राहुल निकम यांनी भारतीय संविधानाला अपेक्षित सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित झाले आहे काय या विषयावर आपले विचार व्यक्त केले. भारतीय संविधानाला अपेक्षित स्त्री- पुरुष समानता आणि देशातील स्री- व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न या विषयावर डॉक्टर सरोज डांगे, संत गाडगेबाबा विद्यापीठ नागपूर व डॉक्टर लीलाधर पाटील, धनदाई महाविद्यालय, अमळनेर यांनी सविस्तर मांडणी केली. किरण सोनवणे यांनी अध्यक्ष स्थानावरून भारतीय संविधानाच्या समोरील असणाऱ्या आव्हानांच्या संदर्भात सविस्तर मांडणी केली. समाज दिशाहीन झाला आहे. परंतु भारतीय संविधान मात्र या समाजाला सांभाळायला परिपूर्ण समर्थ आहे. भारताच्या मागील 75 वर्षाच्या काळामध्ये कितीतरी चढ-उतार या देशाने पाहिलेले आहेत. परंतु अत्यंत बिकट आणि कठीण परिस्थितीमध्ये या देशाला सावरण्याचे काम भारतीय संविधानाने निर्विवादपणे केले आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गुलाबरावजी पाटील यांनी संविधान परिषदेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार समाजावर असून मी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मंत्री झालो आहे असे उद्गार काढले. माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते काकासाहेब खंबाळकर मुंबई, प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड डोंबिवली, मोहन भाऊ अडांगळे, नाशिक यांना संविधान लढा चेतना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.