-
*एरंडोल शेतशिवारातील वीजेच्या तारांमध्ये स्पार्कींगमुळे गव्हाला आग लागून ५० हजारांचा गहू जळून खाक………!*
*प्रशासनाकडून नुकसान भरपाईची शेतकऱ्याची मागणी…………!*

एरंडोल प्रतिनिधी –
निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देणाऱ्या बळीराजाला आता महावितरणच्या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला आहे. एरंडोल येथील धरणगाव रस्त्यालगत असलेल्या महिला शेतकरी शिलाबाई चंद्रकांत महाजन यांच्या शेतातील कापणीला आलेला गहू सोमवारी दुपारी विजेच्या तारांच्या स्पार्किंगमुळे लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाला. यात शेतकऱ्याचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की सोमवारी ३० मार्च २०२६ रोजी दुपारी एरंडोल शिवारातील एका डीपीमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. महावितरणचे कर्मचारी ‘ ड्रॉप आऊट फ्यूज ‘ टाकण्याचे काम करत असताना अचानक वीज तारांमध्ये जोरदार स्पार्किंग झाले. या ठिणग्या खाली असलेल्या गव्हाच्या वाळलेल्या पिकावर पडल्या आणि क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले.परिणामी कापणीला आलेला ५० हजार रुपये किंमतीचा तयार गहू जळून भस्मसात झाला.डोळ्यादेखत सोन्यासारखे पीक राख झाल्याने शेतकरी कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे.
” वर्षभर घाम गाळून पीक उभे केले, पण काढणीच्या वेळीच महावितरणच्या चुकीमुळे सर्व काही संपले. शासनाने व महावितरणने तातडीने पंचनामा करून भरपाई द्यावी.”
— नुकसानग्रस्त शेतकरी
सुदैवाने वीज पुरवठा वेळेत खंडित केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, अन्यथा शेजारच्या शेतांनाही आगीचा विळखा बसला असता. या घटनेची तक्रार महावितरणकडे करण्यात आली असून, प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
