-
*संस्कारांची गंगोत्री कविताच : प्रा.वा. ना.आंधळे*
-

पारोळा प्रतिनिधी – संस्कार हा मानवी आयुष्याचा अविभाज्य भाग असून संस्काराने मानवी जीवनाला मूल्य प्राप्त होते.माणूस हा संस्कारांनी ओळखला जातो.ही संस्कारांची खाण कविता या साहित्य प्रकारातून मानवी आयुष्यात आलीय.ती कशी हे अनेक कवनांचे दाखले देत एरंडोल येथील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी पारोळा येथील बोहरा सेंट्रल स्कूल आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर काव्यमहती
साधार मांडली. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.त्यावेळी व्यासपीठावर बोहरा सेंट्रल स्कूलचे संचालक मा. बोहराजी,प्राचार्या श्रीमती शोभा सोनी,मराठी विभाग प्रमुख सौ.मंजुषा पाटील व अन्य मराठी शिक्षिका भगिनींनी उपस्थिती होती.
ते आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की,मराठीचे प्राचीनत्व आणि मराठी साहित्याची अनेक साहित्य प्रकारातून झालेली वाटचाल ही तिच्यातल्या अभिजाततेचे नितांत दर्शन घडवणारी आहे.असे सांगत श्रेष्ठ कवी वि.वा. शिरवाडकरांचे साहित्य योगदान हे आभाळउंचीचे असून समाजसमृद्धीसाठी ते ठायीठायी कामी आलेय.असे सांगत काही कवींच्या कवितांचे रंजन व प्रबोधन या दृष्टीने त्यांनी बहारदार सादरीकरण केले.
यावेळी मराठीची थोरवी व महाराष्ट्राची थोरवी गाणाऱ्या गीतांवर विद्यार्थी विद्यार्थींनींनी विविध नृत्य सादर केलीत.याच समारंभात तेरा मराठी शिक्षिका भगिनींचा सत्कार प्रा.आंधळे यांचे शुभहस्ते करण्यात आला.अशा या भरगच्च समारंभाचे सूत्र संचलन व आभार प्रदर्शन बोहरा सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थींनींनी केले.
