-
*इको गाडीचे चाक अंगावरून गेल्याने चार वर्षीय बालक जागीच गतप्राण,बालकाच्या अपघाती निधनामुळे गावांत हळहळ……..!*
एरंडोल प्रतिनिधी – शाळेतील मुलांची ने आण करणारी इको गाडी भरधाव वेगाने चालवल्याने शुभम योनाक्ष मासाळ ( वय ४ वर्षे ) याला धक्का लागल्याने तो रस्त्यावर पडला व त्याच्या अंगावरून गाडीचे चाक गेल्याने तो जागीच गतप्राण झाला.ही दुर्घटना ४ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पिंपळकोठा खुर्द गावात घडली. याप्रकरणी नारायण शंकर मासाळ यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून इको गाडीचा चालक मनोज मुक्तारसिंग पाटील,रा .पिंपळकोठा बु.याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळकोठा खुर्द येथील माजी सरपंच नारायण मासाळ यांचे नातू आरुष (वय ६ वर्षे )व शुभम (वय ४वर्षे ) हे दोघे जीपीएस ग्रुप पाळधी येथे शिक्षण घेत असून त्यांना शाळेत ये जा करण्यासाठी मारुती सुझुकी कंपनीची ईको गाडी एम एच १९ इ ए ६८५६ ही लावली होती.त्या गाडीचा चालक मनोज मुक्तारसिंग पाटील हा त्या दोघांना दररोज शाळेत नेण्यासाठी व शाळेतून घरी सोडण्यासाठी घरी येत असे.४ जुलै २०२५ रोजी सकाळी आरुष व शुभम हे सदर गाडीने शाळेत गेले होते. शाळा सुटल्यानंतर ते दोन्ही बालके त्या गाडीने गावी पोहचल्यावर ते गाडीतून खाली उतरले.उतरल्यानंतर सदर गाडी भरधाव वेगाने चालवल्याने शुभम मासाळ यास गाडीचा धक्का लागल्याने तो रस्त्यावर पडला व त्याच्या अंगावरून गाडीचे चाक गेल्याने शुभम हा जागीच गतप्राण झाला.
त्यानंतर ग्रामीण रूग्णालय एरंडोल येथे शुभमचे शवविच्छेदन करण्यात आले.रात्री उशिरा शुभमचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले व जवळपास रात्री १० वाजेच्या सुमारास पिंपळकोठा खु.येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान शुभमचा मृतदेह घेऊन गाडी गावाला पोहचली असता शुभमचे आईवडील व कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.कुटुंबीयांचा विशेषतः शुभमच्या मातेचा आक्रोश पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
याप्रकरणी एरंडोल पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील हे पुढील तपास करीत आहेत.