-
*हायवे चकाकले पण बळीराजा चिखलात, एरंडोल तालुक्यातील शेत-पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था………!*
*प्रशासकीय अनास्थेचा फटका,शेतीमाल डोक्यावर वाहून नेण्याची शेतकऱ्यांवर वेळ……!*
एरंडोल प्रतिनिधी – देशात एकीकडे हायवेचे जाळे विस्तारत असताना दुसरीकडे एरंडोल तालुक्यातील बळीराजा आजही गुडघाभर चिखल तुडवत शेती करत आहे. तालुक्यातील शेत-पाणंद रस्त्यांच्या भीषण दुरावस्थेमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, प्रशासकीय अनास्थेमुळे आता ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे.तालुक्यात आजमितीस सुमारे २०० हून अधिक शिवरस्ते चिखलात माखले आहेत.पावसामुळे या रस्त्यांवरून बैलगाड्या किंवा ट्रॅक्टर नेणे अशक्य झाले आहे. परिणामी, ऐन हंगामात खते आणि अवजारे शेतात नेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. शेतीमाल वेळेवर बाजारपेठेत पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांना हक्काच्या भावापासून वंचित राहावे लागत आहे.
एरंडोल येथील कमल लॉन्स समोरून गुजर हद्द शेत शिवारातून जवखेडे खुर्द जगधन वस्ती शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कमल लॉन्स लगतच्या छोट्या नालीतून येणारे पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने तिथे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलातूनच चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेची वाट धरावी लागत आहे. ” वाट सापडेना शेतात कसा जाऊ, अन् नाही गेलो तर वर्षभर काय खाऊ ? ” अशा आर्त वेदना सध्या एरंडोलमधील त्रस्त शेतकरी व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे जवखेडे ग्रामपंचायतीने रस्त्याबाबत ठराव केला आहे, तसेच वारंवार निवेदने देऊनही जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि भू-अभिलेख विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने ‘ बाबत प्रशिक्षण पार पडले आणि महसूलमंत्र्यांनी निधीची तरतूदही केली. मात्र, ” प्रत्यक्ष जमिनीवर काम कधी सुरू होणार?” हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
प्रशासनाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या यातना लक्षात घेऊन तातडीने शासकीय योजनेतून हे शिवरस्ते तयार करून द्यावेत अशी मागणी होत आहे. जर येत्या काळात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. तर एरंडोल परिसरातील शेतकरी मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

