-
एरंडोल नगरपरिषदेकडून ‘उष्माघात जनजागृती’ व पाणपोई अभियानाला प्रारंभ
एरंडोल प्रतिनिधी –
उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी एरंडोल नगरपरिषदेतर्फे ‘उष्माघात जनजागृती अभियान’ हाती घेण्यात आले आहे. “उष्माघात टाळा… आरोग्य जपा… सुरक्षित रहा…” या संदेशाद्वारे शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.नगरपरिषदेकडून शहरातील विविध प्रमुख ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली असून बस स्थानक, धरणगाव चौफुली, मरिमाता चौक आणि म्हसावद नाका या भागांत नागरिकांसाठी थंड व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे उन्हाळ्यात नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
यासोबतच नगरपरिषदेचे कर्मचारी घरोघरी जाऊन पॅम्पलेट वाटप करून उष्माघाताबाबत जनजागृती करत आहेत. नागरिकांना उष्माघाताची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि काळजी याबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात येत आहे.
या उपक्रमाबाबत माहिती देताना मुख्याधिकारी **अमोल बागुल** यांनी सांगितले की, “उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी नगरपरिषदेकडून जनजागृतीसोबतच पाणपोईसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नागरिकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”
अभियानांतर्गत शहरात ठिकठिकाणी उष्माघाताची लक्षणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच आपत्कालीन मदत याबाबत माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. नागरिकांनी भरपूर पाणी पिणे, दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळणे, डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करणे, तसेच हलका व पौष्टिक आहार घेणे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
एरंडोल नगरपरिषदेतर्फे नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सजग राहण्याचे आणि शहरातील पाणपोई सुविधांचा योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, नागरिकांच्या सहकार्यामुळे हे अभियान अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
—

