-
*एरंडोल तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी ३० जूनपर्यंत ‘ हयात प्रमाणपत्र ‘ देणे बंधनकारक,अन्यथा मानधन थांबणार…………!*
एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आणि केंद्र सरकारच्या विविध निवृत्ती वेतन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी प्रशासनाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी ३० जून २०२६ पूर्वी आपले ‘ डिजिटल हयात प्रमाणपत्र ‘ आणि उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मुदतीत प्रमाणपत्र न दिल्यास पुढील अनुदान ऑनलाईन पद्धतीने आपोआप बंद होईल.असा इशारा तहसीलदार गोपाळ पाटील यांनी दिला आहे.
लाभार्थी खालील पर्यायांचा वापर करून ‘ बेनिफिशियरी सत्यापन ॲप ‘ द्वारे आपले डिजिटल हयात प्रमाणपत्र नोंदवू शकतात.स्वतःच्या मोबाईलमधील ॲपद्वारे,जवळच्या सेतू सुविधा केंद्रात किंवा ‘आपले सरकार’ सेवा केंद्रात तसेच संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) कार्यालयात प्रमाणपत्र मिळवू शकतात.
डिजिटल हयात प्रमाणपत्रासाठी शासनाने केवळ ५० रुपये फी निश्चित केली आहे. कोणत्याही सेतू केंद्राने किंवा एजंटने ५० रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेतल्यास त्यांच्यावर थेट निलंबनाची कडक कारवाई करण्यात येईल.असा इशारा तहसीलदार गोपाळ पाटील यांनी दिला आहे.
कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास लाभार्थ्यांनी आपले तलाठी, कोतवाल किंवा एरंडोल तहसील कार्यालयातील ‘ संजय गांधी योजना ‘ शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
