- *एरंडोल येथे उष्माघाताचा शेतमजूर महिलेचा पहिला बळी…..?*
एरंडोल प्रतिनिधी – येथे सखुबाई अशोक देशमुख ( वय ६० वर्षे ) या महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना २४ एप्रिल २०२६ रोजी झाल्याचा दावा देशमुख कुटुंबीयांनी केला आहे.त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.मात्र याबाबत एरंडोल ग्रामीण रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.कैलास पाटील यांच्याशी या संदर्भात संपर्क केला असता आमच्याकडे तसा कुणीही अहवाल पाठवला नसल्याचे स्पष्ट केले.दरम्यान एरंडोल येथे गेल्या २ ते ३ दिवसांपासून तापमानाचा पारा ४३ अंशापेक्षा अधिक वाढला आहे.तापमानाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शेतमजूर व नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी.असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
एरंडोल येथील देशमुख मढी परिसरातील सखुबाई अशोक देशमुख ह्या शुक्रवारी २४ एप्रिल २०२६ रोजी महेंद्र महाजन या शेतकऱ्याच्या शेतात निंदणीच्या कामासाठी इतर महिला मजुरांसोबत गेल्या असतांना तिथेच त्यांची अचानक तब्येत बिघडली.त्यानंतर झाडाखाली थोडावेळ आराम केल्यावर त्यांना डॉ.सुयश पाटील यांच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे त्यांचा ई सी जी काढण्यात आला असता त्यांचा यापुर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
देशमुख कुटुंब हे शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात.सखुबाई देशमुख यांच्या पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्या मृतदेहावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबाला सतत गरीबीशी संघर्ष करून अतोनात कष्ट उपसावे लागतात.त्यामुळे सखुबाईंचा उष्माघाताने घेतलेला पहीला बळी गेल्याची सर्वत्र चर्चा आहे.

