-
पांडवनगरीत महिला शक्तीचा जागर, महिला उद्योजिका मेळाव्याला एरंडोलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद………!

एरंडोल pratinidhi – येथील टेनिस स्क्रिएशन क्लबच्या भव्य प्रांगणात १५ मार्च २०२६ रोजी ‘ पांडव नगरी महिला उद्योजिका भव्य मेळावा ’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात परिसरातील महिला उद्योजिकांनी आपल्या कौशल्याचे आणि जिद्दीचे दर्शन घडविले. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत रंगलेल्या या मेळाव्याला महिलांचा आणि परिसरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.या मेळाव्याचे उद्घाटन एरंडोल-पारोळा विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमोल पाटील व प्रमुख अतिथी म्हणून त्यांच्या धर्मपत्नी मृणालताई पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार अमोल पाटील भावूक झाले ते म्हणाले की
” महिलांच्या या प्रेरणादायी कार्यक्रमाला आज सपत्नीक उपस्थित राहून उद्घाटन करण्याचा मान मिळाला. ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांना आर्थिक सक्षमतेची प्रेरणा मिळते.”
या सोहळ्याला महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, उपनगराध्यक्षा सुनिता माळी, नगरसेविका डॉ. गीतांजली ठाकुर माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे , मणिकर्णिका चौधरी, आरती महाजन, माजी नगराध्यक्षा शकुंतला अहिरराव, शोभा साळी यांच्यासह अनेक मान्यवर ,महिला मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उद्घाटनानंतर महिलांसाठी विशेष मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सहभागी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. मेळाव्यात उभारण्यात आलेल्या विविध स्टॉल्सना आमदार अमोल पाटील आणि मृणालताई पाटील यांनी भेट दिली.महिलांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तू व हस्तकला,घरगुती चवीचे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स,स्थानिक महिलांनी स्वतः विकसित केलेले लघुउद्योग.
प्रत्येक स्टॉलमधून महिलांची मेहनत, कल्पकता आणि स्वावलंबनाची जिद्द स्पष्टपणे दिसून येत होती. मान्यवरांनी महिला उद्योजिकांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या मेळाव्यामुळे स्थानिक महिला उद्योजिकांना आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. आयोजकांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत असून, यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
