- *एरंडोल बसस्थानकात दररोज प्रवासी सोसताहेत उन्हाचे चटके,नुतनीकरणाचे काम कासवगतीने………..!*
एरंडोल प्रतिनिधी – सध्या ‘ मे हीट ‘ सारखा उन्हाची तीव्रता सर्वत्र जाणवत असल्याने एरंडोल बसस्थानकात नुतनीकरणाच्या कामाला अजुनही वेग प्राप्त न झाल्याने वाहनतळाच्या अपुर्ण जागेत प्रवाशांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.विशेषत: लहान मुलांना कडेवर घेऊन किंवा खाली मातीत बसवून मातांना बस लागण्याची तासंतास उन्हात प्रतिक्षा करावी लागत आहे.तसेच वयोवृद्ध व्यक्तींना हातातली काठी जमीनीवर आडवी करून तापलेल्या जमिनीवर बसण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.एकंदरीत प्रवाशांचे हे हाल अधिकाधिक दिवसागणिक तीव्र होत आहेत.या पार्श्वभूमीवर वाहनतळाच्या परिसरात युद्ध पातळीवरून प्रवाशांचा तीव्र उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शेड उभारणे नितांत गरजेचे आहे.
एरंडोल बसस्थानकाच्या वाहनतळ आवारात जवळपास निम्मे भागात नुतनीकरणाचे काम ४ ते ५ महिन्यांपासून संथ गतीने सुरू असून उर्वरित वाहनतळ भागात ये जा करणाऱ्या बसगाड्या उभ्या केल्या जातात.तसेच बसगाड्यांमध्ये प्रवासाकरीता जाणारे प्रवासी अक्षरशः असह्य होणाऱ्या तीव्र उन्हात उभे राहतात किंवा तापलेल्या जमिनीवर खाली नाईलाजाने बसतात.विशेष हे की या भागात घनदाट छाया देणारे अशा डेरेदार वृक्षांचा अभाव आहे.तशात अपुऱ्या जागेत बसगाड्या येथून प्रवासाला निघणारे प्रवासी बसमधून परतणारे प्रवासी हा सर्व सोपस्कार तीव्र उन्हात पार पाडला जात आहे.उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे जर एखाद दुसऱ्या प्रवाशाला उष्माघात झाला तर त्याला जबाबदार ठेकेदार की स्थानिक एस टी महामंडळ प्रशासन अशी संतापजनक चर्चा प्रवासी गोटातून होत आहे.
एरंडोल हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत असून येथे बस आगारातून काही गाड्या लावल्या जातात.तर काही गाड्या बाहेर गावाहून ये जा करतात.दररोज येथून ३० ते ४० हजार प्रवासी ये जा करतात.असे असतांना प्रवाशांच्या उन्हापासून बचाव करण्याबाबत एस टी महामंडळ उदासीन का? असा सवाल केला जात आहे.याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास जास्तीत जास्त प्रवासी बसस्थानकाबाहेर सज्ज असलेल्या अवैध प्रवासी वाहनांकडे वळतील असे बोलले जाते.
