-
आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या प्रेरणेतून व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनामूल्य नेत्र तपासणी, मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न –
एरंडोल प्रतिनिधी – आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या प्रेरणेतून व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनामूल्य नेत्र तपासणी, मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराचे आज उत्साहपूर्ण वातावरणात आणि नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले.
याप्रसंगी शिवसेना, युवासेना व विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवसैनिक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना वेळेअभावी, आर्थिक अडचणींमुळे किंवा शहरांपर्यंत जाण्याच्या गैरसोयीमुळे योग्य वेळी नेत्रसेवा मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर “तुमचे आरोग्य, आमचे सर्वोच्च प्राधान्य” या ध्येयाने प्रेरित होऊन हा उपक्रम राबविण्यात येत असून, आरोग्य सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचविण्याचा हा एक प्रभावी प्रयत्न आहे.
शिबिराची वैशिष्ट्ये – तज्ज्ञ डॉक्टरांकडून अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू असलेल्या रुग्णांसाठी अत्याधुनिक SICS पद्धतीने शस्त्रक्रिया, शस्त्रक्रिया अत्यल्प वेळेत (सुमारे १५–२० मिनिटांत) पूर्ण होणारी सुविधा, ऑपरेशननंतर लागणारी सर्व औषधे (एक आठवड्याची) पूर्णतः मोफत, तसेच रुग्णांच्या येण्या-जाण्याची व मुक्कामाची सोय करण्यात आली आहे.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. आरोग्य सेवेच्या क्षेत्रात असे उपक्रम राबवून सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा सहज आणि मोफत मिळावी, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. अनेकदा छोट्या आजारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होतात, विशेषतः डोळ्यांच्या बाबतीत. योग्य वेळी तपासणी व उपचार झाले तर अनेकांना पुन्हा नवजीवन मिळू शकते.या शिबिराच्या माध्यमातून आपण फक्त तपासणी करत नाही, तर अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचे काम करत आहोत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हीच आमची खरी जबाबदारी आहे आणि भविष्यातही अशा लोकहिताच्या उपक्रमांना आम्ही सातत्याने प्राधान्य देत राहू.”
अशा या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, समाजाच्या आरोग्यदृष्ट्या सक्षम व जागरूक भविष्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.

